Thursday, May 12, 2011

मुक्तांगण


चैत्रांगणातल्या तोरणाची पाने काढताना हाक आलेली, " अगं ए, काय चाल्लय?" तापू लागलेल्या अंगणात चटचटणारे पाय गुलाबी झाक चढवू लागलेले. रांगोळीचा शेवटचा उकार काढायचा राहिला होता. लक्ष सगळं तिकडेच! प्रश्नकर्तीकडे ओळखीच हासू आणि आणखी एक उलट प्रश्न फेकून परत शेवटच्या पानाकडे! इथे आणखी काय असत बरं? हो, वेल. परत पानेच! तो वेल चौकटीला बिलगून वरपर्यंत चढतो. आणखी काय राहिलेय? मोरपिस? रणछॊडदास.. उगाचच लांबलचक नाव आठवते. सरळ सरळ श्रीकृष्ण म्हणायला काय जाते? नाहीच! रणछॊडदास.. कुण्या काळी माघार घ्यावी लागली म्हणून कायमचेच चिकटलेले बिरुद! मग, सहस्त्र वेळचा विजयही इथे ते नाव पुसू शकत नाही. बापरे! सहस्त्र बायका, प्रत्येकीची कशी तर्‍हा असेल? त्याने त्यांची सुटका केली, आणि मग पालनकर्ता म्हणून आपले नाव दिले वगैरे ठिक आहे, पण मग आठ बायका कशा सांभाळल्या असतील? पैकी खरंच ह्रदयातली कोणती आणि राजकारणातली कोणती? गरुड तर कधी नीट जमतच नाही. रणछोडदासाचेच वाहन! तुळशीकट्ट्यातली तुळस जरा जास्तच दणकट आलीय. कुंडी त्यामानाने केविलवाणी दिसतेय! कुणी केलीच चेष्टा तर सांगायचे, पाणी जास्त घातले म्हणून! नाग प्रकरण चांगले आहे. सोपे, सुटसुटीत. नागपंचमीत काढलेल्या रांगोळीचे बोन्साय वाटतेय!
चंद्र, चांदणी, शंख, चक्र कुठेही अ‍ॅडजस्ट होवून जाते. चंद्र पूर्ण काढतच नाही ना कधी.. चंद्रकोर असते नेहमी.. ओढाळ मनाचे प्रतिक! हे टिपीकल चक्र पाहिले की, बुध्दाचे दगडी वेटोळ्याचे केस आठवतात. खास तीच मूर्ती, तेच आकार. उभ्या संपन्न संसारातल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी पूर्ण रिता झालेला सिध्दार्थ! आणि संपूर्ण अर्थ उमगल्यागत दगडी मूर्तीतही गूढ भाव तसेच ठेवणारा बुध्द.. तो सगळंच सोडून आत कुठेतरी निघून गेला असावा.

When I give up the helm
I know that the time has come for thee to take it.
What there is to do will be instantly done.
Vain is this struggle

य़ेस.. वेन इज धिस स्ट्रगल! शेवटी काय मिळते यावरच स्ट्रगलची किंमत ठरत असेल तर, हे व्यर्थच आहे. & the sky gazes on its own endless blue and dreams. एन्डलेस ब्लू.. मस्त शब्द आहे.
बाकी काय उरले? कासव.. सोमेश्वर देवळाच्या चौकोनी तलावात कित्ती कासवे होती. छोटी, छोटी. फारशी गर्दी नसते तिथे. हिरव्या पाण्याचे चौकोनी कुंड, त्यात मध्यभागी देऊळ! देवळात जायला लहान रस्ता.. या कुंडात कुठेतरी जिवंत झरा असेलच. जिवंत झरा? हे काय प्रकरण आहे? मृत झरा कसा असतो आणि? जर पाणीच नसेल तर झरा म्हणणारच नाही ना..
"लई उश्शीर झालाय.. आत जा गो बाय.. "
होय. रांगोळी आवरली आहे. बाकी फाफटपसाराही आवरता घ्यायला हवा.. मनातल्या रांगोळ्य़ा काय; पसरत, फिस्कटत असतातच!

Thursday, April 14, 2011

गारपीट

मागच्या वर्षीचा पाऊस
असाच भसकन कोसळला होता
हलकेच दार वाजवून येण्याची रीत नाही,
असं बडाबडा बडबडू नये,
इतक्या मोठ्या आवाजात ओरडू नये,
याचं भान नाही..
असाच टवाळ, उनाड, मुक्त होता
मागच्या वर्षीचा पाऊस
तीच अधमुरी दुपारची वेळ
तसाच झुकत्या पागोळ्यांचा खेळ
गदगदलेलं आभाळ पुसताना
विस्कटलेला दिशादिशांमधला मेळ
गारांचा गजबजाट अन त्यांचे भंगलेले आकार
दाराशी उमटलेले ओल्या पावलांचे उकार
असाच नंतर शून्य होत गेलेला
मागच्या वर्षीचा पाऊस
नादही सारखाच तीन पावसांमधला
फक्त यंदा चिंब भिजवून गेला नाही
नाहीतर अगदी सारखाच हा आणि
मागच्या वर्षीचा पाऊस..


Tuesday, March 15, 2011

पडद्यामागचा पडदा

माध्यम हा एक अजब प्रकार आहे. जो केमिस्ट्रीमधे वापरतो आणि मानवी नातेसंबंधामधेही!मला एक फार गोड माध्यम मिळाले काही दिवसांपूर्वी! कर्नाटकातल्या एका लहानशा गावी जाणे झाले. मी बर्‍याच वर्षांपूर्वी आणि एक दोनदाच तिथे गेले असेन. आईच्या माहेरचे दुसरे गाव. तिथला मोठ्ठा वाडा आठवायचा मलाही अधून मधून.. धुळीने भरलेल्या निमुळत्या वाटेवरुन आणि निळी बस आली की मुकाट्याने रस्त्याबाहेर जाऊन थांबण्याची कसरत करत आम्ही पोहोचलो. वाटेत जरा मोकळे रान दिसले, की ’हा बाळोबाचा माळ! इथे रात्री भुते येतात असे आम्हाला सारुक्का सांगायच्या लहानपणी!’ इथून स्टोरीला सुरवात झाली. नंतर आधीच्याहून मोठे आणि वैराण असे तीन माळ आम्ही मागे टाकले आणि प्रत्येक वेळी आधीचा बाळोबाचा नव्हे हाच तो! हे कन्फर्म होत गेले. तिसर्‍या आणि शेवटच्या माळावर कुणीही वाद घातला नाही आणि तिथेच येऊन भुते नाचतात यावर शिक्कामोर्तब झाले.
’इथून वळून सरळ आलं लगेच!’ मधल्या ’लगेच’चा अर्थ दिड तास हे लवकरच कळून चुकले. दिड तासात शक्य तितकी धूळ आणि उन खात आम्ही मुक्कामापर्यंत पोहोचलो. फारसं काही बदललेलं नव्हतं. सरकारी योजना तळागाळात जाऊन जितके बदल करता येणं शक्य होतं तितकच! तोच रस्ता, निमुळता, रस्ता नसलेला रस्ता.. समोर वाडा.. या वेळी वाडा थोडा भकास वाटला. आम्ही आत गेलो.

थोडा वेळ गेल्यावर आजूबाजूचे बदल टिपत आईच्या गप्पा सुरु झाल्या. इथे आम्ही हे करत होतो, तिथे ते खेळत असायचो.. वगैरे.. घर दाखवताना मधल्या लहान सोप्यापाशी आलो. तिथे गौरी बसायच्या म्हणे! त्यांना करत असलेल्या कमानीची उंची हाताने दाखवत ती भराभर दारं उघडत आत गेली. काहीतरी शोधत, ते तिथे आहे का चाचपडत असल्यासारखी! काही गोष्टी मिळाल्या असतील.. बर्‍याच दिसल्या नसतील.

"हे आज्जीच कपाट! अजूनही आहे; लाकडी आणि मजबूत!"

ते पिवळट लाकडी कपाट, अडगळीत जाण्याच्या मार्गावर असलेलं.. तोंडावर भलमोठं कुलुप घेऊन कोपर्‍यात तिरकं बसल्यासारखं.. कधी आज्जीच्या बर्‍याच गोष्टी पोटात दडवल्या असतील त्याने! आकडे, मेणाचं कुंकू, हस्तिदंती पिना, नऊवारी कडक पोताच्या साड्या, क्वचित सोन्या-चांदीच्या वस्तूही.. घरातल्या मुली परकरात होत्या तेव्हाच एकदम नऊ बाळकृष्ण आणले होते म्हणे तिने.. सख्खं, चुलत वगैरे काही न मानता, सगळ्या मुलींचे जे असेल ते एकदमच! मुलांच्याही काही गोष्टी कधी दडल्या असतील त्यात! जमवलेल्या बिट्ट्या, गोटे, हातातले नाजूक कांकण.. आवडते पुस्तक किंवा लहान भावासाठी खाऊ!

"ही लहान खिडकी म्हणजे आमची हेरगिरी करण्याची जागा.. बाहेरचं सगळं दिसायच इथून.. पण बाहेरुन आत काहीच नाही.. चिकाचा पडदा असल्यासारखं!"

त्या खिडकीला आता जळमटांनी वेढले आहे. प्रयत्न करुन बघूयात म्हटले तरी, आतून आता बाहेर काही दिसणार नाही. बाहेरुन मात्र विणकाम करुन भरलेला मोर वरती लावलेला दिसतो.

"इथे आत्ता नुसती मोकळी जागा आहे, पण जुनं स्वयंपाकघर इथेच होतं. आणि सकाळची न्याहरी, पंगत इथेच असायची. आम्ही सगळे एकत्र..."

'एकत्रनंतरची पाच सेकंदांची इनोसंट गॅप मोठी आहे आणि उदास आहे.

"आणि हे देवघर! इथे रोज परसातल्या फुलांचा ढीग असायचा. आणि शेजारी हा लोण्याचा खांब"
"लोण्याचा? कुठे ते? काय ते?"
"म्हणजे ताक घुसळायचा खांब. तुझी आज्जी इथे ताक घुसळून झाल्यावर थोडे लोणी काढून या खांबाला लावून ठेवायची आणि मग नंतर ते लोणी खाण्यासाठी आम्ही ती जाण्याची वाट बघत बसायचो. तिने जास्तित जास्त लोणी खांबाला लावावे असे आम्हाला वाटायचे!"

तो सुबक नक्षिदार खांब अजूनही तुपकट होवून चमकतोय असं वाटलं. देवघरा शेजारीच त्याची जागा आहे.
"आणि मागे पाहिलंस का? खूप मोठ्ठी जागा आहे, म्हणजे होती.. आता काय झालंय कुणास ठाऊक!"

वाड्यामागची मोठ्ठी जागा मलाही आठवत होती.. संध्याकाळी सातनंतर तिथे भूत येते असं काहीस आमच्या मनावर ठसवण्यात आलं होतं मग खेळ अर्धवट सोडून आत यावे लागायचे.

"अग्गोबाई, चाफा आहे तसाच आहे, चैत्रात या चाफ्याची फुले वाहतात. आपल्या मळ्यातला लाल चाफा, तसा हा पांढरा चाफा! आणि ती बटणगुलाबाची फुले, आणि अबोली, मिरचीची रोपं.."

दिसेल त्या सगळ्या सोयर्‍यांना नावाने हाका मारुन झाल्या. त्यांचा ही पोहोचला असेल तिच्यापर्यंत!

"इथे कुठेतरी खरं का खोटं आज्जीचे घर होते ना आई?"
"हो.. तेच ते लहान खिडकी दिसतेय ते घर"
जवळच राहणार्‍या आज्जी.. प्रत्येक दोन वाक्यांनंतर त्यांना खरं का खोटं?’ असं विचारायची सवय होती.. त्याच नावाने त्या ओळखल्या जायच्या. लांबलचक असलं तरी बाकी मंडळींनी किंवा आम्ही त्यांचे पेट नेम घेण्यास कधीच कंटाळा केला नाही.

"झालं आता, बरीच वर्षे झाली त्यांना जाऊन! हे पाहिलंस का? टेबल टेनिसचं टेबल? आणि बंदूक?"
आजोबांच्या खास खेळाच्या खोलीत जुन्या भिंतीला मुटकुळं करुन टेकलेलं हिरवं टेबल आणि कोपर्‍यातली बंदूक.. त्या खोलीतल्या जुनेपणाच्या खुणा फ़्लॅट स्क्रिन टिव्हीला आणि नविन सजावटीला मुळीच सामावून घेत नव्हत्या. बर्‍याच वर्षांपूर्वी जेव्हा इथे आले होते. तेव्हाही काही बदल असतील कदाचित, निरखून पाहिले नव्हते इतकंच!

आपण आपलं नॉस्टॅल्जिक होणं बरेचदा पाहतो.. कुणा माध्यमातून हे पाहणं, जसं रंगिबेरंगी धागे विणताना पहात त्यातलीच एक नक्षी होऊन जाणं.. तिच्या सांगण्यात मी कुठेच नव्हते पण तिथे फक्त मीच होते. घरभर फिरुन ओळखीचे काही नाद, रंग, हेरगिरीची खिडकी जिथे उघडते, त्या सोप्यातले काही उन्हाळ्याचे दिवस, माजघरातल्या पावसाळी रात्री, लाकडी जुन्या झोपाळ्याचे चार दोन झोके सगळं सगळं गोळा करुन ती म्हणाली, "आता जाऊयात आपण! उशिर होतोय.. "
थकलेल्या,वाकलेल्या काकी परत येण्याबद्दल बजावत होत्या. बाहेर दारातच मस्त अबोली फुलून आली होती.

"अबोली जरा जास्तच बोलतेय! "

आणि परतीच्या प्रवासात आईच्या गाठोड्यात आणखी एक बोलणारा रंग अधिक झाला होता. 



Wednesday, December 15, 2010

पोंगल

गोड पोंगल


साहित्य:-

 तांदूळ- १ वाटी,

 मूगडाळ- १/२ वाटी,

 गूळ- १ वाटी,

 दूध- ३ वाट्या,

 लवंग- ३,

 वेलदोडे- ४,

 काजू- १०-१२,

 बेदाणे- १०-१२

 तूप- ३ चमचे,

 ताजं खोबरं- भरपूर

कॄती-

  • प्रथम एक वाटी तांदूळ धुवून पूर्ण न निथळता किंचित पाण्यात एक तास पाण्यात भिजवावे. मूगडाळ एक चमचा तुपात लालसर भाजून घ्यावी. भाजतानाच त्यात लवंगा टाकाव्यात. नंतर डाळही धुवून पूर्ण निथळून एक तास भिजत ठेवावी. गूळ बारीक चिरुन ठेवावा. 
  • जाड पातेल्यात ३ वाट्या दूध, एक वाटी पाण्याबरोबर गरम करावे. उकळी आल्यावर त्यात तांदूळ व डाळ घालावी.
  • कमी आचेवर दूध पातेल्याला लागू न देता अधूनमधून ढवळत रहावे. (१० मि.)
  • आता एक वाटी गूळ घालावा.(जास्त गोडीसाठी दिड वाटी) गूळ विरघळून डाळ तांदूळ एकत्र झाल्यावर दोन चमचे तूप घालावे. नंतर काजू, बेदाणे, वेलदोडे, आणि दोन वाट्या खोबरं घालून मिसळावे.
  • एक वाफ आल्यावर परत थोडे खोबरे आणि १ चमचा तूप शिजलेल्या पोंगलमधे घालावे.
  • खोबरे जास्त घातले तरी छान लागते. अधिक नारळाचे दूधही वापरतात.


Friday, December 3, 2010

क्षणमात्र

वेळ तशी रहदारीची होती पण तो रोड फारसा गजबजलेला नव्हता. नसतोस बरेचदा! घरी जाताना नकळत वेग वाढलेला..मुख्य रस्त्याला थोड्या अंतराने दोन फाटे फुटतात त्यातल्या पहिल्या फाटयातून रहदारीच्या सर्व नियमांना फाटा देवून एक गाडी, बहुदा बोलेरो, जोरात वळण देऊन पुढे गेली. गाडीतल्या डॅशबोर्डवरचा छोटा टेडी आणि अंगावर येणारा करडा रंग मला स्मरतो. क्षणाचा अर्धा, पाव जो काही भाग असेल त्यात एक विचित्र जाणीव इतकी तिव्रतेने झाली, की तो लहानसा काळही तासभर घडत असल्यासारखा वाटला. मृत्यूची भिती असेल, अनपेक्षित गोष्टीचा धक्का असेल, इतक्या वेळेत नक्की काय करायचे न सुचून आलेली हतबलता असेल.. मी पडले नव्हते, पण काहीतरी मोठे घडल्यासारखे वाटत होते. थोडी थरथर थांबली, तेव्हा समोर पाहिले तो, पुढे जाऊन काही अंतरावर ती गाडी थांबली होती. मी जिवंत आहे व हालचाल करीत आहेसे पाहून पुढे निघून गेली. मला त्याला गाठून भांडायची ताकतच नव्हती. जाऊ दे, म्हणून तशीच घरी आले.

काल, दिवसभराच्या शेवटच्या उजळणीत तो प्रसंग आला आणि मनातल्या मनात काही अ‍ॅनालिसिस सुरु झाले. एखाद्या क्षणार्धात एवढा वेळ असेल असे कधी वाटले नव्हते. ’तो क्षण युगासारखा भासला ’, ’रात्र सरता सरत नव्हती ’, ’काळ थांबून राहिला होता ’ वगैरे वाक्ये पुस्तकात लय भारी वाटतात. तसे होते म्हणजे नक्की काय कधी समजले नव्ह्ते. हाही क्षण म्हणजे हीच वाक्ये असेही नाही पण बरिचशी जवळपास.. होय असंच काहीसं..

त्या अर्ध्या क्षणाचे आणखी तुकडे केले तर प्रत्येक तुकडा काही आठवणींचा होता. मला घर आठवले, काही काळज्या आणि एक मैत्रिण! स्पष्ट, लख्ख आठवण नाहीच म्हणता येणार, पण एखाद्या कडक शिस्तिच्या शाळेत मुलांची रांग लावताना पहिल्या मुलाला उभं केल्यावर मागच्यांनी आपोआपच पटापट मागे उभं रहावं, तशीच काहीशी , आठवणींची रांग! नुसते संदर्भ होते. स्प्ष्टीकरण मी मागाहून घुसडलं :)

परतीच्या वेळेत मला आठवला तृप्तीचा अपघात! तो खूपच वेदनादायी होता. नंतर महिनाभराच्या विश्रांतीसाठी ती इकडेच आली होती. तिचा हात प्लॅस्टरमधे होता, व्यवस्थित उपचार झाले होते. आठवड्याभरापूर्वीच्या अपघाताचे वर्णन सांगताना तेच ते प्रश्न उत्तर चालू होतं.. कधी, कुठे, कसं?? ट्रॅफिकचा काय भरवसा नाही वगैरे.. सगळी प्रश्नोत्तरे झाल्यावर ती माझ्याकडे आली. "काय म्हणतीस?" नेहमीचा सूचक प्रश्न टाकून झाल्यावर सूचक हसली. (या प्रश्नात आणखीही बरेच प्रश्न दडलेले असतात)
"खूप दुखतं आहे का गं?"

"आत्ता नाही, पण तेव्हा.. मला जाणवत होतं, आपलं हाड फ्रॅक्चर झालयं.. आणि हॉस्पिटलमधे ऑपरेशनपूर्वी तात्पुरतं प्लॅस्टर घालताना तर.. प्रचंड.. ब्रह्म आठवलं गं मीनू "
तिच्या काळ्या काळ्या डोळ्यात त्यावेळेच्या वेदनेचं पाणी आलं. तिला तो क्षण परत जागवून दिल्याबद्दल मला खूप अपराधी वाटलं. मग मात्र एकही प्रश्न न विचारता टिपी करत तिच्या हातावर झोकदार सही करुन शल्य कमी करण्याचा मी प्रयत्न केला.

तिला एका क्षणाचं जे ब्रह्म आठवलं, ते वेदनेच होत. माझ्या एका क्षणात आठवलेल्या ब्रह्माचा संदर्भ केवळ भितीशी होता का? माहित नाही...

विकल्या न गेलेल्या फुग्यांच्या एकत्र गाठी बांधून संध्याकाळी कुणी फुगेवाला सायकलवरुन परत जावा, आणि त्याच्यामागे हाss मुलांचा घोळका गलबल करत जाव तसं काहीसं झालं.. संध्याकाळच्या उजळणीत अर्थाअर्थी काहीही संबंध नसणार्‍या गोष्टीही घोळका करुन कलकलाट करत आल्या. हेही आठवलं की प्लॅस्टर उतरवून आता तिला एक महिना होईल. आपण साधा फोनही केलेला नाही..

" मग, आणि काय म्हणतीस?"

तिचा फोनवरचा निरोप, सुरवातीच्या प्रश्नासारखाच असतो. तिला खूप आनंद झालेला दिसला.

"सांगते ना, येशिल तर खरं! जपून रहा गं.."

त्या एका क्षणाच्या नंतर शेपट्या फारच वाढल्या पण त्यामुळे जे मंथन झालं, ते नक्की लिहिता येणार नाही. आपल्या बाबतीत घडणार्‍या अघटिताचा आपण असा कितीसा विचार करतो? आणि का करावा? माहिती नसतं काय होणार आहे म्हणूनच ’अनपेक्षित’ शब्द वापरतात ना! पण असे काही प्रसंग दैनंदिन कामाच्या घोळात कुठेतरी लपून बसलेल्या महत्वाच्या गोष्टींना बाहेर ओढून काढतात. किंबहुना त्यासाठीच ते अनपेक्षितरित्या घडत असावेत का?  
हे फारसं लॉजिकल नाहीये, पण असंच होत असावं..

Saturday, November 20, 2010

अंजिर फिरनी

अंजिर फिरनी

साहित्य:-

दूध-१ लिटर,
बासमती तांदूळ- ४ चमचे,
साखर- ५ चमचे,
अंजिर- १
काजू- १०,१२
पिस्ता, बदाम- ८,१०
वेलदोडे- ३

(चमचा-मोठा टे.स्पून)


कॄती-

प्रथम तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवावे. नंतर खरबरीत वाटून घेऊन अर्धा वाटी पाणी घालून ठेवावे.
अंजिर बारीक तुकडे करुन अर्धा वाटी दूधाबरोबर मिक्सर मधून काढावे. त्याची थोडी पेस्ट होईल, थोडे तुकडे तसेच राहतील. हे वाटीभर मिश्रण तसेच बाजूला ठेवावे.
काजू, पिस्ता, बदाम चिरुन ठेवावे. साधारण अर्धा चमचा पूड होईल इतके वेलदोडे कुटून ठेवावे.
शक्यतो नॉनस्टीक भांड्यात दुध तापत ठेवावे. त्याला उकळी आल्यानंतर तांदूळ दूधात घालावेत. नंतर साखर, वेलची पावडर घालावी. ती विरघळल्यावर काजू, बदाम, पिस्ते घालावेत. मंद आचेवर मिश्रण सतत ढवळावे. सर्वात शेवटी अंजिर पेस्ट घालावी. ५ मिनिटे किंवा साधारण दाट होत आले की गॅस बंद करावा. फिरनी थंड होत आली की आणखी थोडी आळते. अशी दाट खीर वरुन थोडे काजू घालून वाढावी.



टीप-
अंजिर ऎवजी स्ट्रॉबेरी किंवा दूधाबरोबर सूट होणारी इतर फळे घालूनही छान लागते. स्ट्रॉबेरी वापरताना बारीक तुकडेच करावेत. मिक्सरमधून काढू नये.
साखरेचे प्रमाण इथे कमी घेतले आहे कारण अंजिराचाही गोडवा त्यात अधिक होतो. फळानुसार साखर कमी जास्त करावी.

Tuesday, November 2, 2010

अशांतीच कार्टं

भारतने ओरिगामी हंसाची लिंक दिली आणि नव्या छंदाला सुरवात झाली. यासाठी ४८४ लहान त्रिकोण दुमडावे लागत होते. दोन दिवसातच घरभर कागदाचे कपटे पसरले. घरच्या मंडळींच्या कोणतेही टेबल रिकामे न ठेवल्याच्या कुरकुरीकडे साफ दुर्लक्ष करुन हे काम पूर्ण करणे थोडे ट्रिकी आहे. मग जसे त्रिकोण पुर्ण होतील, तसे जोडायला सुरवात केली. पाच-सहा दिवसांत झाला एकदाचा पूर्ण तो हंस! मग ’इथे नको तिथे ठेव, त्याच्या मानेला हात लावू नकोस, उंच जागी ठेव’ असली इतरांवर माझी दमदाटी सुरु झाली. दमदाटी संपायला एक कारण घडले आणि काही दृष्टीकोनही बदलले.

पूर्वकल्पना न देता गडबडीच्या वेळी, किंवा वेळ काढायला, अचानक चाल करुन येणारी बरीच मंडळी आहेत. अशाच एका आख्ख्या कुटुंबाला आम्ही भितो.. वाट फुटेल तिथे (दोनच वाटा आहेत) पळून गेलेल्या मंडळींपैकी जो बाहेरच्या खोलीत उरेल, त्याने त्यांना तोंड द्यायचे असा अलिखित नियम आहे. (मी ९०% वेळा माडीवर पळून जाण्यात यशस्वी झाले आहे) तर, त्या दिवशी आम्ही संध्याकाळी बाहेर पडणारच होतो तोपर्यंत ती मंडळी घरी आली. पैकी दोन लहान मुलांनी काही मिनिटांतच मोठ्या आवाजात भांडणं करण्यास सुरवात केली. त्यांच्या आरडाओरडीकडे यत्किंचित लक्ष न देता, बाईंनी त्याहून मोठ्या आवाजात गप्पा मारण्यास सुरवात केली. नुकतीच व्यवस्थित लावलेली, साडीतल्या हेमामालिनी सारखी दिसणारी खोली नजरेसमोर आली, आणि आता बाहेर गेल्यावर तिची अवस्था शमिता शेट्टी पेक्षाही (हो, ही नटी आहे) गईगुजरी झाली असणार याची खात्रीच पटली.

" अरे, अशा उश्या फेकू नकोस, कोचवर नाचू नकोस. " आमच्याच घरातल्या व्यक्तीचा केविलवाणा आवाज ऎकू आला.
" आणि तो हत्तीचा शो पीस ओढू नकोस तुटेल, नाजूक आहे, दिल्लीहून..." तो शो पिस आणणार्‍या व्यक्तीचे पुढचे शब्द हवेतच विरुन गेले. मुलांबरोबर आलेल्या बाई नक्की तिथेच आहेत ना, याची खात्री करुन घ्यावी आणि जमलं तर एखाद्याच्या पाठीत धपाटा मारता आला तर पहावा म्हणून मी जाणार एवढ्यात बाईंचा आवाज आलाच,
" ए, ऎकले ना त्यांनी काय सांगितले ते? पिल्लू गं माझं.. जा खेळ जा! तर, मी काय म्हणत होते...."
मुलांनी नव्या उत्साहाने मोडतोडीस आपलं, खेळण्यास प्रारंभ केला. दृष्टीआड सृष्टी नात्याने, मी लपून असले तरी, येणार्‍या आवाजाला कोणतीच भिंत रोखू शकत नव्हती.

" माला हे पायजे, माला ते पन पायजे "

" मी राक्षस आहे, मी तुला खानार "

लहान मुलाला स्वतःची ओळख एवढ्या लवकर कशी पटली याचे नवल करेपर्यंत एक वाक्य कानावर आले आणि एकदम काहीतरी लक्षात आले.

" हे काय कागदाचं आहे ? "

दोन दिवसांपूर्वी ओरिगामी हंस किरकोळ दुरुस्तीसाठी टेबलावर ठेवला होता. त्या मुलाने त्यावर झडप घातलेला, हंस खाली पडलेला आणि मुलाच्या खिदळण्याचा आवाज तेवढा ऎकू आला. माझ्या आईचे संतापाने त्याला काही बोललेलेही ऎकू आले. एक आठवडा खपून तयार केलेले सगळे विस्कटून गेले. अगदीच रहावले नाही म्हणून मीही बाहेर गेले. आणि पसरलेले तुकडे गोळा करु लागले.

"तू आहेस होय घरी? मला वाटलं, बाहेर गेलीस की काय? अगं, ते त्याला सांगेपर्यंत तुटलंच! "- बाई.

बाईंचा मुलांवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न मला मुळीच आवडला नाही. कुणाला काही वाटण्याची पर्वा न करता त्या मुलाला समोर बोलवून मी ५ मिनिटे रागावून बोलले. त्या बाईंना ते आवडले नसावे, त्यांनी काढता पाय घेतला.. पण लपून बसण्यापेक्षा हे पुष्कळ बरे होते. प्रश्न फक्त ती वस्तू तुटण्याचा नव्ह्ता. मुले दंगा करणारच, काही मोडतोड करणारच! आपल्या सर्वांच्याच घरी लहान मुले असतात. पण इतकी विध्वंसक मुले आणि त्याहूनही त्यांना काहीही न बोलता, सांगता त्याकडे कौतुकाने बघत बसणारी वडील माणसे आश्चर्यचकित करतात. बरे, मुलांना आपण काही सांगावे तर त्यांना आवडत नाही.
असो, यातूनही चांगल्या गोष्टी घडल्या म्हणजे, मला परत नविन हंस बनवता येईल आणि तो मुलगाही मला टरकून असेल. :)

त्याच्यानिमित्याने तरी, बोळा निघाला आणि अक्षरे वाहती झाली.

********************************************************************

आपल्या सर्वांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!